व्यापाऱ्याला बिश्नोई गँगकडून धमकी; थेट पोलिसांनाच चॅलेंज?
पुणे : खरा पंचनामा
पुण्यात बिश्नोई गँगकडून सुरू असलेला धुडगूस थांबण्याचे नाव घेत नसून, आता शहरातील आणखी एका बड्या व्यापाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. गेल्या आठवड्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला धमकावण्याची ही पुण्यातील तिसरी घटना आहे. याप्रकरणी पुण्यातील उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तमनगर भागातील एका बड्या व्यापाऱ्याला शनिवारी सकाळी इंटरनेट कॉलद्वारे धमकीचा फोन आला. फोन करणाऱ्याने आपली ओळख थेट 'शुभम लोणकर' अशी करून दिली.
तक्रारदार व्यापारी हे उत्तमनगर-शिवणे मर्चेंट्स असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. आरोपीने फोनवर बोलताना व्यापाऱ्याचा बांधकाम व्यवसाय, त्यांच्या कारचा नोंदणी क्रमांक आणि त्यांच्या दैनंदिन हालचालींची आपल्याला खडान् खडा माहिती असल्याचा दावा केला.
इतकेच नव्हे तर व्यापाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती देखील आपल्याकडे असल्याचे सांगत 'स्वतःची काळजी घ्या' असा इशारा दिला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दोन कोटी रुपये तयार ठेवण्यास सांगून पुढील सूचना लवकरच देऊ, असे बजावले. या संपूर्ण प्रकारामुळे घाबरलेल्या व्यापाऱ्याने तत्काळ उत्तमनगर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
पुण्यात अवघ्या एका आठवड्यात बिश्नोई टोळीने खंडणी मागण्याची ही तिसरी धक्कादायक घटना घडल्याने व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण आहे. यापूर्वी २२ जून रोजी वानवडी परिसरातील एका स्टील उद्योगपतीकडे तब्बल ५० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणीसाठी मंतरवाडी येथील त्यांच्या कारखान्यावर गोळीबारही करण्यात आला होता.
त्यानंतर लगेचच २३ जून रोजी वडकी येथील एका औषध घाऊक विक्रेत्याला फोन करून २ कोटींची खंडणी मागण्यात आली होती. ही मालिका सुरू असतानाच आता उत्तमनगरमध्ये तिसरा गुन्हा घडल्याने बिश्नोई गँगने थेट पुणे पोलिसांनाच आव्हान दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.