लग्नपत्रिकेवर लिहावी लागणार वधू-वराची जन्मतारीख
बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : खरा पंचनामा
लग्नपत्रिकेवरती आता नवरा-नवरीच्या नावापुढे जन्मतारीख लिहावी लागणार आहे. राजस्थान सरकारच्या निर्णयानंतर लवकरच महाराष्ट्रातही याची अंमलबावणी केली जाणार आहे.
याबाबत राज्य सरकार लवकरच नियम लागू करणार असल्याचे सांगितले जात असून, बालविवाहाचं धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर सरकारला जाग आली आहे. हा नियम लागू झाल्यास लग्नाच्या वेळी वय तपासणे सोपे होईल आणि बालविवाह रोखण्यास मदत मिळेल, असे सरकारचे मत आहे. यामुळे लग्नाच्या निमंत्रणपत्रिकांवर जन्मतारीख छापल्याने सामाजिक जबाबदारी वाढेल आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणेही सुलभ होईल.
विधानसभेत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील बालविवाहाचे प्रमाण अजूनही धोकादायक पातळीवर आहे. यामुळे सरकारला या समस्येची गंभीर जाणीव झाली आहे. परभणी जिल्ह्यात ४८ टक्के, बीडमध्ये ४३.७ टक्के, धुळ्यात ४०.५ टक्के आणि सोलापूर जिल्ह्यात ४०.३ टक्के मुलींचे १८ वर्षांपूर्वी विवाह झाल्याची धक्कादायक माहिती सरकारने दिली आहे. राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांतही बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक आहे. राजस्थानच्या धर्तीवर हा नियम महाराष्ट्रात लागू करण्यासाठी सरकार गांभीर्याने विचार करत असून, गृह विभाग व महिला व बाल विकास विभागाला यासंबंधीच्या शिफारसी करण्यात आल्या आहेत.
महिला व बालविकास विभागाने विधानसभेत सादर केलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले की, बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि एकूण विकासावर गंभीर परिणाम होत आहेत. या समस्येला आळा घालण्यासाठी सरकार कायद्याची कडक अंमलबजावणी, नवीन नियमावली तयार करणे आणि विशेष जनजागृती मोहिमा राबवण्याचे प्रयत्न करत आहे. याच दिशेने राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याच्या प्रस्तावाचा अभ्यास सुरू आहे. हा नियम पूर्णपणे लागू झाल्यानंतर, लग्नपत्रिका छापताना प्रिंटिंग प्रेस चालकांना वधू-वरांचे आधार कार्ड किंवा जन्माचा दाखला पाहूनच जन्मतारीख छापावी लागेल, अशी तरतूद असू शकते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.