गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करा
कोल्हापुरात सर्वपक्षीय मोर्चा, मोठ्या संख्येने बाधित उपस्थित
कोल्हापूर : खरा पंचनामा
शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीतर्फे मंगळवारी (दि. ९) जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत आसगावकर यांच्यासह बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याचे दिसून येत आहे.
नुकतेच शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला शासनाने मंजुरी दिली आहे. यात दिग्रज (ता. जि. वर्धा) ते बांदा (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) पर्यंत ८५६.७८ कि. मी. चा मार्ग होणार असून, यात १३ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांचा समावेश आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ७३ गावे, सांगलीतील २५ गावे, सातारा जिल्ह्यातील १६ गावे, सोलापूर जिल्ह्यातील ३५ गावांचा समावेश आहे. याशिवाय अनेक नद्यांवर पूल व डोंगर परिसरात घाट होणार आहेत.
शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांची सुपीक जमीन धोक्यात आली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा शक्तिपीठ महामार्गाला विरोध होताना दिसून येत आहे. 'गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करा,' अशी मागणी करत आज कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा दसरा चौकातून सुरू झाला असून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यात वारणा नदी पार करून जुने पारगाव येथे प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर करवीर, राधानगरी, भुदरगड, आजरा व चंदगड तालुक्यांतून इसापूर भागातून तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणार आहे. तर, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातून सुरुवात होणारा मार्ग पलूस, कडेगाव, वाळवा तालुक्यांतून कोल्हापूर जिल्ह्यात येणार आहे.
त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील म्हसवड भागातून हा मार्ग जात मायणीच्या पुढील बाजूस सांगलीतील खानापूर तालुक्यात प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करीत बार्शी, माढा, माळशिरस या तालुक्यांतून तो सातारा जिल्ह्यात जाणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.