यंदाचं पावसाळी अधिवेशन, २२ जूनपासून
तीन आठवडे चालणार कामकाज
मुंबई : खरा पंचनामा
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. हे अधिवेशन २२ जूनपासून मुंबईत सुरू होणार आहे. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
१० जुलैपर्यंत चालणाऱ्या या तीन आठवड्यांच्या अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या आणि ज्वलंत विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभेचे कामकाज सकाळी ११ वाजता, तर विधान परिषदेचे कामकाज दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. राज्यपाल विष्णू देव वर्मा यांच्या मान्यतेनंतर विधिमंडळ सचिवालयाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.
या अधिवेशनात वाढती गुन्हेगारी, शेतकरी कर्जमाफी, मान्सूनपूर्व कामांमधील त्रुटी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, खत व बियाण्यांचा तुटवडा यांसारख्या मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. याशिवाय, नोकऱ्यांमधील समांतर आरक्षण रद्द करण्याच्या हालचाली आणि अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाचा मुद्दाही अधिवेशनात गाजण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, सरकारकडून काही महत्त्वाची विधेयके सादर केली जाणार असल्याची चर्चा असून, विरोधकांच्या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी सत्ताधारी पक्षही आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यंदाचे पावसाळी अधिवेशन राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.