मान्सूनची गाडी अडकली ! राज्यात उकाड्याचा कहर कायम
'या' कारणामुळे पाऊस पुढे सरकेना
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्रात दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) वाटचाल सध्या मंदावली असून राज्यातील नागरिकांना आणखी काही दिवस उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनची उत्तर सीमा गेल्या दोन दिवसांपासून कोकणातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर परिसरातच स्थिरावली आहे.
वातावरणातील आर्द्रतेचा अभाव आणि वाऱ्यांचा वेग कमी झाल्याने मान्सूनच्या प्रगतीला ब्रेक लागला आहे. मात्र, पुढील तीन ते चार दिवसांत हवामानात अनुकूल बदल होण्याची शक्यता असून त्यानंतर मान्सून पुन्हा वेग पकडू शकतो.
हवामान तज्ज्ञांच्या मते, गुजरात आणि उत्तर अरबी समुद्रावर सध्या प्रभावी प्रतिचक्रवात (अँटीसायक्लॉन) सक्रिय आहे. ही प्रणाली मान्सूनच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने कोरडी हवा खेचून आणत असल्याने मोसमी वाऱ्यांचा वेग कमी झाला आहे. परिणामी पावसाचे ढग तयार होण्यास अडथळा निर्माण होत असून मान्सूनची उत्तर दिशेकडील वाटचाल थांबली आहे.
सध्या अनेक भागांत आकाश ढगाळ दिसत असले तरी पावसासाठी आवश्यक असलेली ढगांची घनता निर्माण होत नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. प्रतिचक्रवाताचा प्रभाव कमी झाल्यानंतरच मान्सून मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर भागांकडे वेगाने सरकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, हवामान खात्याने गुरुवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा तसेच विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दुसरीकडे मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप काही दिवस संयम बाळगावा लागणार असून, जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्यानंतरच पेरणी करण्याचा सल्ला कृषी आणि हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.