'वंदे मातरम्' वरून काँग्रेस-भाजप आमनेसामने
अमित शाह म्हणाले, "तुष्टीकरण सहन करणार नाही"
दिल्ली : खरा पंचनामा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वंदे मातरम गाण्यावरून काँग्रेस पक्षावर कडक टीका केली आहे. 'वंदे मातरम'चे केवळ दोनच कडवे गाण्याचा त्यांचा निर्णय 'देशविरोधी' आहे. काँग्रेसने पुन्हा एकदा 'तुष्टीकरणाचे राजकारण' सुरू केले आहे. ज्या मार्गामुळे देशाला यापूर्वी प्रचंड नुकसान सोसावे लागले होते आणि देशाला पुन्हा त्या दिशेने नेणे धोकादायक आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
"काँग्रेसने 'वंदे मातरम'चे केवळ दोनच कडवे गाण्याचा निर्णय घेतला आहे. १९३७ मध्ये, मुस्लिमांना खूश करण्यासाठी 'वंदे मातरम'चे दोन भाग करून काँग्रेसने देशाच्या फाळणीची पायाभरणी केली होती. त्या कृतीतूनच 'द्वि-राष्ट्र सिद्धांता'ची सुरुवात झाली, ज्यामुळे अखेरीस देशाची फाळणी झाली आणि पाकिस्तानची निर्मिती झाली." असे अमित शाह म्हणाले.
आज तीच ऐतिहासिक चूक पुन्हा केली जात आहे. 'वंदे मातरम'ला १५० वर्षे पूर्ण होत असताना, मोदी सरकारने बंकिमचंद्र यांच्या या अजरामर गीताचे पूर्ण गायन करून राष्ट्रीय एकता बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याला कायदेशीर आधारही आहे. या पार्श्वभूमीवर, अमित शहा यांनी काँग्रेसच्या निर्णयाचा निषेध केला आणि तो चुकीचा असल्याचे म्हटले.
पुढे अमित शाह म्हणाले की, "काँग्रेसचा हा निर्णय केवळ त्यांच्या मुस्लिम तुष्टीकरणाच्या धोरणाचे लक्षण आहे. असे करून त्यांनी केवळ बंकिमचंद्र यांच्या अजरामर कलाकृतीचाच नव्हे, तर 'वंदे मातरम'चा जयघोष करत फासावर चढलेल्या लाखो हुतात्म्यांचाही अपमान केला आहे. आज काँग्रेस पक्ष १९३७ मध्ये स्वीकारलेले तेच धोरण राबवत आहे आणि देशाच्या कायद्याकडे दुर्लक्ष करत आहे."
“राहुल गांधी हे तुष्टीकरणाचे राजकारण पुढे नेत आहेत, हे पाहून आश्चर्य वाटते. मला वाटते की, त्याकाळी 'वंदे मातरम'चे विभाजन करण्याचा निर्णय ही एक चूक होती आणि त्याचे गंभीर परिणाम आपण यापूर्वीच भोगले आहेत. आता देशातील जनतेने एकत्र येऊन काँग्रेसविरुद्ध आवाज उठवला पाहिजे."
“तुष्टीकरणाचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही. हा स्वतंत्र देश आहे हे दाखवून दिले पाहिजे, असे सांगतानाच भाजप काँग्रेसच्या निर्णयाचा निषेध नोंदवत आहे. आम्ही जनतेत जाऊन आणि विधानसभांमध्येही या विरोधात आवाज उठवणार आहोत, असे शाह म्हणाले.
दरम्यान, पावसाळी अधिवेशनात सविस्तर चर्चेनंतर 'वंदे मातरम'बाबतचे विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकानुसार 'वंदे मातरम्'ची सर्व सहा कडवी गाणे अनिवार्य करण्यात आले आहे.
मात्र, काँग्रेसच्या म्हणण्यानुसार देशाच्या महापुरुषांनीच वंदे मातरमचे दोन कडवे स्वीकारले होते. त्यामुळे आम्हीही दोनच कडवे गाणार. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे आता देशात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.