'आश्वासने देऊन सरकार पळ काढू शकत नाही...' तीन मागण्या अजूनही पूर्ण झाल्या नाहीत, कॉकरोच पार्टीचा शिक्षक दिनी दिल्लीत आणखी एक मोर्चा
पुणे : खरा पंचनामा
कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) सरकारवर चारपैकी तीनमागण्या पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. सीजेपीने सरकार प्रत्येक वेळी अपूर्ण आश्वासने देऊन पळ काढू शकत नाही, असे म्हटलं आहे.
सीजेपीने सरकारसमोर ठेवलेल्या चार मागण्यांपैकी तीन मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. पहिली, विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यात यावी. दुसरी, विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल केलेले एफआयआर मागे घ्यावेत आणि कोणतीही कारवाई करू नये. तिसरी, आरएएफ आणि दिल्ली पोलिसांनी माफी मागावी. या पार्श्वभूमीवर कॉकरोच पार्टी 5 सप्टेंबर रोजी दिल्लीत आणखी एका मोर्चाचे आयोजन करत आहे. त्यांनी जनतेलाही यात सामील होण्याचे आवाहन केले आहे. नीट पेपरफुटी आणि परीक्षेतील अनियमिततेवर कारवाईच्या मागणीसाठी सीजेपीने 20 जून रोजी जंतर मंतर येथे आंदोलन सुरू केले होते. सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी 25 जुलै रोजी आपले आंदोलन संपवले.
5 सप्टेंबर रोजी, हा मोर्चा इंडिया गेटपासून सुरू होऊन नवी दिल्ली पोलीस मुख्यालयाकडे जाईल. यामध्ये नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचाही समावेश असेल.
24 ऑगस्ट रोजी झालेल्या आपल्या कार्यकारी समितीच्या आभासी बैठकीनंतर सीजेपीने हा निर्णय घेतला. पक्षाने म्हटले आहे की, सरकारने विद्यार्थ्यांवरील खटले मागे घेण्याचे आश्वासन दिले होते, परंतु तसे झाले नाही. त्यांनी आमच्या संयमाला आमची कमजोरी समजू नये.
दुसरीकडे, 20 जुलै रोजी, सीजेपीने संसद मोर्चा आयोजित केला होता. तथापि, दिल्ली पोलिसांनी मोर्चासाठी परवानगी नाकारली. मोर्चादरम्यान आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने जंतर मंतर येथील पोलीस कारवाईची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली. 20 ऑगस्ट रोजी, सर्वोच्च न्यायालयाने संसद मोर्चादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय उच्चाधिकार समितीच्या नावांची घोषणा केली. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यामध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश रविशंकर झा, दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश शालिंदर कौर, सीबीआयचे माजी संचालक ऋषी कुमार शुक्ला आणि मेघालयाचे निवृत्त डीजीपी डॉ. एल. आर. बिश्नोई यांचा समावेश आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.